न्यायमूर्ती चांदुरकर यांसह तीन न्यायाधीशांचा शपथविधी   

नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल एस. चांदुरकर यांसह कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया, गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांना शुक्रवारी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ दिली. यासोबतच, सर्वोच्च न्यायालयातील सर्व ३४ पदे भरली गेली आहेत.
 
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने न्यायमूर्ती चांदुरकर, अंजारिया आणि बिश्नोई यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली होती. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी सरन्यायाधीशांशी चर्चा केल्यानंतर तिघांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते, असे  कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितले.तत्कालिन सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती अभय एस. ओका आणि हृषिकेश रॉय यांच्या निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयातील तीन पदे रिकामी झाली होती.  
 
न्यायमूर्ती अंजारिया यांनी २५ फेब्रुवारी २०२४ रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती. न्यायमूर्ती बिश्नोई यांनी ५ फेब्रुवारी २०२४ रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. तर, चांदुरकर यांना २१ जून २०१३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती मिळाली होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी ९ जून रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे, आणखी एक पद रिकामे होणार आहे.

Related Articles